28/01/2026
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा एक आश्वासक नेता आज आपण गमावला आहे. अजितदादा खर्या अर्थाने सामाजिक व राजकारणातील दादा होते.
राजकारणात उजवे-डावे, भगवे-हिरवे, प्रामाणिक-भ्रष्ट अशी विभागणी नेहमी होत असते. वास्तविक आपल्यासारख्या सामान्य लोकांना अशा कुठल्याही विभागणीनी फरक पडत नाही. आपल्याला एकाच विभागणीनी फरक पडतो तो म्हणजे काम करणारे आणि नुसती बडबड करणारे. अजित पवार निश्चित पहिल्या प्रकारात. अगदी कोव्हिडच्या काळात सुद्धा रोज सकाळी वेळेवर मंत्रालयात हजर राहून कामं करत राहण्याच्या गोष्टी अनेकांनी सांगितल्या आहेत.
ते विरोधीपक्ष नेते असताना ग्राहक पेठ दिवाळी सरंजाम योजनेबद्दल आणि त्याच्या रास्त दराबद्दल उत्सुकतेने चौकशी केली होती. आणि कळत न कळत शासनाच्या ‘आनंद शिधा’शी त्यांनी तुलना केली होती.
ग्राहक पेठ व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!